बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

यूपीएससीचा श्रीगणेशा, स्वरूप, अर्हता

१) केंद्र सरकारद्वारा निवडले जाणारे अधिकारी : आयएएस, आयपीएस, आयआरएस इ. आपल्याला परिचित असणारे व ज्याचे आकर्षण बहुतेक सर्वांनाच असते ते पद म्हणजेच कलेक्टर - जिल्हाधिकारी. (हा अधिकारी आयएएस दर्जाचा असतो.) केंद्र सरकारद्वारे निवडले जाणारे हे अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या यूपीएससी या परीक्षेद्वारे निवडले जातात.

2) राज्य सरकारद्वारा निवडले जाणारे अधिकारी : डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार आदी एमपीएससीच्या परीक्षेतून निवडले जातात.

3)यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आपण २४ विविध पदांद्वारे केंद्र सरकारच्या सेवेत दाखल होऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम यूपीएससीबद्दलच्या चुकीच्या धारणा बाजूला सारणे आवश्यक आहे. 

4)ग्रामीण‌ विद्यार्थी आणि यूपीएससी : दिवसेंदिवस ग्रामीण विद्यार्थ्यांचे यूपीएससीतून उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत असून, ग्रामीण विद्यार्थ्याला यूपीएससी जमणार नाही वा त्यांनी प्रयत्न करू नये या धारणांना ग्रामीण विद्यार्थ्यांनी चपखल उत्तर दिले आहे.

5)मुलाखतीत विचित्र प्रश्न विचारले जातात : उदा. तुमच्या टायला किती गाठी आहेत? तुम्ही किती पायऱ्या चढून आलात? वगैरे. खरं तर मुलाखत ही ‘व्यक्तिमत्त्वाची चाचणी’ म्हणून बघितली जाते. यातील प्रश्न आपण यूपीएससीला दिलेल्या माहितीवर (Biodata) व चालू घडामोडींवर आधारित असतात. उमेदवाराचे चित्त स्थिर आहे किंवा नाही यासाठी असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यात घाबरण्याचे काहीही कारण नाही.

6)यूपीएससी ही सर्वसमावेशक असून, कोणत्याही घटकांना अपायकारक होईल असे निर्णय घेत नाही. सर्व घटक समोर ठेवून त्याचा सारासार ‌विचार यूपीएससी करत असते.

7)काही दिवसांपासून ‘बासवान समिती’ने दिलेल्या अहवालानुसार परीक्षेत बदल होणार, अशी चर्चा सामाजिक माध्यमे, काही वृत्तपत्रांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात असून, विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की,-
     १) जोपर्यंत यूपीएससी तशी नोटीस जारी करत नाही तोपर्यंत अशा चर्चेत स्वत:चा वेळ वाया घालवू नये,
     २) जर परीक्षेत बदल झालाच तर तो सर्वांसाठी असेल,
     ३) वैकल्प‌िक विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये द्विधा मनस्थ‌िती पाहायला मिळत असून, जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत अभ्यास करत राहणेच योग्य ठरते.

8)यूपीएससी परीक्षेसाठी पात्रता निकष : १) नागरिकत्व : आयएएस किंवा आयपीएस या सेवांकरिता भारतीय नागरिकच पात्र आहेत. २) इतर २२ सेवांकरिता नेपाळ, भूतान, तिबेटमधील निर्वासित व इतर काही देशांतून भारतीय वंशाचे स्थलांतरित नागरिकांनाही समाविष्ट करून घेतले जाते. त्यासाठीचे निकष त्यांनी upscgov.in या संकेतस्थळावर पाहावेत.

9)शैक्षणिक पात्रता : विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो, की मुक्त विद्यापीठातील पदवीधर (जसे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) या परीक्षेसाठी पात्र असतात का? तर असतात. ‘मुक्त विद्यापीठ’ असल्याने फरक पडत नाही. विद्यार्थ्याने फक्त ज्या विद्यापीठातून पदवी पूर्ण करणार आहे ते विद्यापीठ मान्यताप्राप्त आहे किंवा नाही हे आधीच तपासून घ्यावं.

10)परीक्षा शुल्क : परीक्षा तीन टप्प्यांत होते. यासाठीचे शुल्क हे पूर्वपरीक्षा १०० रुपये व मुख्य परीक्षा २०० रुपये असे असते. नोट : महिला/एससी/एसटी/पीएच यांना परीक्षा शुल्क नाही.
परीक्षा केंद्र : पूर्वपरीक्षा - मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर. मुख्य परीक्षा मुंबई येथे पार पडते. (सन २०१८ मध्ये नाशिकचा समावेश पूर्व परीक्षेसाठी होऊ शकतो. नोटिफिकेशन आले की विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यावी.)

11) परीक्षेचे स्वरूप :-

             यूपीएससीची परीक्षा तीन टप्प्यांमध्ये आयोजित केली जाते. एकाच वर्षात हे तिन्ही टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणारा उमेदवार यशस्वी होतो.

12)पूर्वपरीक्षा :-
         
     यात प्रत्येक १०० गुणांचे दोन पेपर असतात. जीएस व सीएसएटी यांतील प्रश्नांचे स्वरूप हे बहुपर्यायी असते.

13)मुख्य परीक्षा :-

       पूर्व परीक्षेतून उत्तीर्ण उमेदवार यासाठी पात्र असतात. या परीक्षे‌त एकूण नऊ लेखी पेपर असतात. यातील सात लेखी पेपर १७५० गुणांचे असतात, ज्यावर मेरिट ठरते. प्रत्येकी ३०० गुणांचे इंग्रजी व प्रादेशिक भाषा-मराठी वा इतर हे दोन पेपर क्वालिफाइंग असतात. गुणवत्ता यादीसाठी यांचे गुण मोजले जात नाहीत.

14)मुलाखत : -

       मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतात. मुलाखत ही नवी दिल्ली या राजधानीच्या शहरात यूपीएससीद्वारे आयोजित केली जाते. मुलाखत ही २७५ गुणांची असते.

15)मुख्य परीक्षा व मुलाखती यांतील गुणांची बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादीद्वारे उत्तीर्ण उमेदवारांची यादी जाहीर केली जाते. उमेदवाराच्या पसंती क्रमानुसार व गुणवत्ता हा निकष समोर ठेवून ‘सेवा’ व ‘केडर’ दिले जाते. याचा अर्थ ‘हवे ते पद’ व ‘हवे ते केडर’ मिळण्यासाठी गुणवत्ता यादीत वरचा क्रमांक असला पाहिजे. ‘केडर’ म्हणजे ज्या क्षेत्रात सेवा द्यायची ते क्षेत्र. प्रामुख्याने ते राज्यनिहाय असते. उदा. महाराष्ट्र, गुजरात इ.

16)यूपीएससीत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांचे हे विधान सदैव स्मरणात ठेवून त्यानुसार कृती करणे आवश्यक आहे.

‘जर तुम्ही उडू शकत नसाल तर धावा,

जर तुम्ही धावू शकत नसाल तर चालत राहा,

जर तुम्ही चालू शकत नसाल तर रांगा,

तुम्ही जे काही कराल,

त्यात सदैव पुढे जाण्याचा ध्यास घेतला पाहिजे.’

      (लेखक_डॉक्टर सुशील बारी म. टा.)