रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष_लक्ष्मीकांत देशमुख


_बडोदा येथे पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे.

परभणीत १९९५ मध्ये ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली अ. भा. मराठी साहित्य संमेलन पार पडले. तेव्हा देशमुख हे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

_त्याचबरोबर ते या संमेलनाच्या आयोजन समितीत कार्याध्यक्ष होते. हे संमेलन ठोकळेबाज पद्धतीने होऊ नये यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. हिंदीचे विख्यात कवी अशोक वाजपेयी यांना उद्घाटक म्हणून बोलावले गेले.

_तेव्हापासूनच इतर भाषेतील मान्यवर साहित्यिकास उद्घाटक म्हणून बोलावण्याची परंपरा संमेलनांमधून सुरू झाली.

_अध्यक्षीय भाषणावरील परिसंवाद, बहुभाषिक कविसंमेलन असे किती तरी उपक्रम या संमेलनात झाले. चंदक्रांत देवतालेंपासून अनेक कवींची हजेरी परभणीच्या साहित्य संमेलनात होती.

_तेवढेच परिश्रम देशमुखांनी, परभणीतील बी. रघुनाथ स्मारकाच्या उभारणीसाठीही घेतले.

_कोल्हापूरला जेव्हा ते जिल्हाधिकारी होते तेव्हा शाहू भवन स्मारकाचे नूतनीकरण करून त्यांनी कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनात मोलाची भर घातली. या कलापुरात, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेले काम हे खूप महत्त्वाचे ठरले.

_अर्थात या प्रशासकीय कामांत संवेदनशीलता जागी असल्यानेच त्यांच्यातील लेखक जिवंत राहिला.

_पाण्यासारख्या प्रश्नावरील दाहकता त्यांनी ‘पाणी! पाणी! पाणी!’ या कथासंग्रहातून मांडली, तर स्त्रीभ्रूण हत्येवर ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. बालकामगारांच्या आयुष्यावरही ‘हरवलेलं बालपण’ ही कादंबरी त्यांनी लिहिली.

_परिश्रमपूर्वक अभ्यास करून त्यांनी ज्या कादंबऱ्या निर्माण केल्या त्यात ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’चे स्थान वरचे. जनजीवनाचा अभ्यास करताना अपरिचित अशा प्रदेशाचे, संस्कृतीचे चित्रणही त्यांनी आस्थेने केले.

_‘प्रशासननामा’, ‘बखर प्रशासनाची’ ही त्यांच्या प्रशासकीय अनुभवावरील पुस्तके आहेत. नांदेड येथे पार पडलेल्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (@spardhavishwa)

_अकोला, नांदेड, परभणी, सांगली, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी प्रशासकीय कारकीर्द करताना त्यांनी विविध अनुभव घेतले. २०१४ साली मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीचे कार्यकारी संचालक म्हणून ते निवृत्त झाले.

_अशी विपुल साहित्यनिर्मिती असणाऱ्या देशमुखांची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी व्हावी ही बाब निश्चितच महत्त्वाची आहे.